Friday, February 5, 2021

रिटायरमेंट प्लॅनिंगकडे वेळीच लक्ष द्या ! : श्री. राजेश देशपांडे, अहमदनगर.

 रिटायरमेंट प्लॅनिंगकडे वेळीच लक्ष द्या !    

- श्री. राजेश देशपांडे,  अहमदनगर. (साभार : महाराष्ट्र टाइम्स: अर्थवृत्त)



एच.एस.बी.सी.या नामांकित संस्थेने केलेल्या आर्थिक सर्व्हेनुसार निवृत्तीवेतन म्हणजेच मासिक पेन्शन मिळणार नसतांनाही ७६ टक्के तरुण अथवा प्रौढांना सध्या चालू आहे तशीच जीवनशैली निवृत्तीनंतर जगावयाची आहे. ४५ टक्के कमावत्या भारतीयांची मानसिकता "कल किसने देखा है" या प्रकारात मोडणारी आहे. नोकरी, व्यवसाय माध्यमातून वाढणार्या मिळकतीचा बराचसा मोठा हिस्सा आपल्या बदलणार्या जीवनशैलीवर अनेकजण खर्च करू लागले आहेत. मागील पिढीला ज्या वस्तू चैन करण्याच्या वाटायच्या त्याच वस्तू नविन पिढीला चमकत्या मॉल संस्कृतीमध्ये जीवनावश्यक वाटू लागल्या आहेत. ऑक्सफर्ड अकॅडेमी जर्नल ऑफ कन्झ्युमर डेटा नुसार अनेक बहुराष्ट्रीय तसेच ग्राहकोपयोगी वस्तूंच्या उत्पादन व विक्री करणार्या कंपन्यांचा " कन्झ्युमर बिहेवियरचा" अभ्यास आणि त्याचा उपयोग फ्रान्स, इंग्लंड, अमेरिका, कॅनडा यासारख्या विकसित देशात झाला आहे. ग्राहकांना आकर्षित करून नफा वाढविण्याची वेळ आणि जागा आता क्रयशक्ती वाढत चाललेल्या भारतामध्ये आहे. मागील आर्थिक इतिहासाची पाने चाळल्यास लोकांना उत्पन्नापेक्षा जास्त प्रमाणात खर्च करायची चंगळवादी सवय अनेक पाश्चात्य अर्थव्यवस्थांनी लावून ठेवली आहे. रोजच्या जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीत ब्रँडचे महत्व तसेच तथाकथित राहणीमानाचा सामाजिक दर्जा उदा. मोबाईलचा ब्रँड किंवा बुटाचा महागडा ब्रँड वापरण्याची सवय यासाठी तत्काळ उपलब्ध होणारे कर्ज ज्या प्रमाणे अमेरिकेमध्ये क्रेडिटकार्ड या गोंडस नावाने सुरु झाले त्याचप्रमाणे आता भारतातही जसा जसा डिजिटल शिक्षणाचा टक्का वाढू लागला तसा तसात त्याचा वापरही वाढू लागला आहे. मागील पिढीच्या सेव्हिंग इकॉनॉमिकडून आपला प्रवास आता दरडोई उत्पन्न वाढू लागल्याने स्पेंडिंग इकोनॉमिकडे सुरु झाला आहे. एका बाजूला वाढत्या अर्थव्यवस्थेला ते मजबूती देणारे आहे. १३५ कोटी लोकसंख्येच्या आपल्या देशात ज्येष्ठ नागरिक आणि अल्पवयीन मुले वगळता जवळजवळ ९५ कोटी नागरिक या - ना त्या मार्गाने जीवनक्रम चालविण्यासाठी पैसा कमावित आहेत. त्यांचा तो पैसा जीवनावश्यक गोष्टींवर ते खर्च करीत आहेत 'एकदाच घ्यायचे पण ते टिकाऊ घ्यायचे'  ही मानसिकता बदलून 'युज अँड थ्रो' "च्या जगात आता अल्प उत्पन्न असणारेही सहजतेने वावरू लागले आहेत. " अंथरूण पाहून हातपाय पसरावेत" या अर्थाच्या म्हणी आता फक्त पुस्तकातच राहिल्याची परिस्थिती हळू हळू दिसत आहे.

. भारतीय बाजारपेठेत शिरण्यासाठी मोठी किंमत अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या मोजित आहेत हे आपण कोरोना सारख्या संकटकाळातही ॲमेझॉन, फेसबुक या सारख्या कंपन्यांनी भारतात केलेल्या गुंतवणुकांवरून पहातच आहोत. अशावेळी पैसा मिळत असतांना त्याचे योग्य नियोजन करण्याइतपत स्वतःचे आर्थिक ज्ञान वाढवणे व त्यासाठी प्रयत्न करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. तरूण वयात मिळणारा पैसा खर्च करतांना अत्यावश्यक, आवश्यक आणि तरतूद केल्यानंतरच अशी क्रमवारी कमावत्या व्यक्तीने करणे गरजेचे आहे. चित्रपट क्षेत्रातील नामवंत ए.के. हंगल, भगवानदादा अशा एक ना अनेक जणांचे जीवनातील उत्तरार्ध आर्थिक हालाखित गेले ते रिटायरमेंट प्लॅनिंग नसल्यानेच. आजही अनेक व्यापारी, लघुउद्योजक, डॉक्टर्स सध्याच्या वेगवान जगात घर, बंगला किंवा व्यावसायिक विस्तारासाठी कर्जे वाढवतांना स्वतःच्या सेवानिवृत्तीच्या कॉर्पस् ला दुय्यम स्थान देतात. चक्रवाढदर म्हणजेच कंपाऊंडिंग हे जगातील आठवे आश्चर्य आहे. मात्र त्याचा फायदा मिळवण्यासाठी वेळ द्यावा लागतो. ज्याला तो समजतो तो " पैशाने पैसा कमावतो.... ज्याला तो समजत नाही तो पैसा गमावतो... " असे महान शास्त्रज्ञ अलबर्ट आईनस्टाईन यांनी म्हटले आहे. सामान्यतः पगारच पुरत नाही तर निवृत्तीकडे कोण पहाणार ? अजून मुले लहान आहेत, त्यांच्या शिक्षणाच्या खर्चाचेच काय करायचे ? असे एक ना अनेक प्रश्न रिटायरमेंट प्लॅनिंग करतांना असू शकतात. मात्र - "इच्छा आहे तेथे मार्ग आहे".

        सन 200४ नंतर सरकारी पेन्शन तर बंदच झाली आहे, त्यामुळे फक्त खाजगी क्षेत्रातीलच नव्हे तर सरकारी नोकरांनीसुध्दा - (उत्पन्न वजा खर्च) = बचत, या ऐवजी (उत्पन्न वजा बचत)= खर्च , हा मंत्र अंगिकारणे जरूरीचे आहे. नोकरीच लागल्यानंतर सुरुवातीस कमी रकमेपासुन जरी गुंतवणुकीस सुरुवात केली तरी जसजसे उत्पन्न वाढू लागते त्याप्रमाणात त्यातील काही हिस्सा हा फक्त सेवानिवृत्ती साठीच असे नियोजन करून घेणे महत्वाचे ठरते. वैद्यकीय तंत्रज्ञान व औषध क्षेत्रातील वाढणार्या संशोधनामुळे संपुर्ण जगातच मानवांचे आयुष्यमान वाढत आहे. भारतात पूर्वीच्या काळातील 60 वर्षांलरील प्रौढ व्यक्तींची सरासरी आयुर्मर्यादा वाढू लागली आहे. परंतू दुसर्या बाजुला बदललेल्या खाण्यापिण्याच्या सवयी, व्यायामाचा अभाव, कामाचा अतिरिक्त ताणतणाव या सारख्या गोष्टींमुळे वृध्दावस्था निरोगी असेलच याची खात्री कोणालाच देता येत नाही. त्यामुळे वास्तव आयुष्य गरजांची पूर्तता करण्यासाठी जितकी महत्वाची ई.एम.आय. ठरते तितकेच किंबहुना त्यापेक्षा जास्त महत्व नियमित गुंतवणुकीस देण्यासाठी स्वतःमध्ये मानसिक बदल घडवणे प्रत्येकासाठी महत्वाचा ठरतो. "Don't put all eggs in one basket'' या प्रमाणेच रिटायरमेंट प्लॅनिंग करतांनाही एन.पी.एस., पी.पी.एफ. याचप्रमाणे भारतीय गुंतवणुकदारांनी पुढील २०-२५ वर्षांनी लागणार्या पेन्शन फंडासाठी भारतीय शेअर बाजारातील चांगल्या ब्लुचिप कंपन्या गुंतवणुक करणाऱ्या रिटायरमेंट फंडात दीर्घावधीचे योग्य नियोजन करून नियमित गुंतवणुक केल्यास फक्त उपभोक्ता म्हणुन खर्च करण्यापेक्षा गुंतवणुकदार म्हणून ब्लुचिप कंपन्यांच्या श्रीमंतीमध्ये आपलीही भागीदारी आपल्याला महागाई दरापेक्षा जास्त दराने परतावा देऊ शकेल. रिटायरमेंट म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य. मुलांचे शिक्षण कौटुंबिक जबाबदार्या, नोकरी व्यवसायातील धावपळ हे सर्व करीत असतांना स्वतःची वैयक्तिक आवड, मग ती पर्यटन असो, बागकाम असो वा संगीत असो याकडे लक्ष देणे अनेकांना जमत नाही.

स्वतःचा व्यापार करणारे व्यावसायिक किंवा स्वतःचा छोटा कारखाना असणारे लघुउद्योजक आपल्या व्यवसायाचे रूपांतर आयुष्यभर कष्ट करून करोडो रुपयांच्या संपत्तीत करतात व तो व्यापार किंवा संस्था पुढील पिढीच्या हवाली करतात अशा वेळी ती संपत्ती बॅलन्सशीटमध्ये वाढण्याबरोबरच योग्यवेळी योग्य नियोजन करून स्वतःच्या रिटायरमेंटचा एक वेगळा कप्पा करणे ही काळाची गरज आहे. वयाच्या तिशीपासुनच योग्य आहार, व्यायाम व गुंतवणुकीतील सातत्य तुमची सेवानिवृत्तीची आनंदयात्रा ठरेल, अन्यथा "संध्या छाया भिववती हृदया" हे ठरलेलेच आहे.


-   श्री. राजेश देशपांडे,  अहमदनगर. (साभार : महाराष्ट्र टाइम्स: अर्थवृत्त)