Friday, January 29, 2021

जामीन राहणे : एक धर्म (आणि) संकट : श्री. उदय कर्वे


महान नाटककार शेक्सपिअर पासून ते भारतीय संतांपर्यंत सर्वानीच कर्जव्यवहार
, जामीन राहणे इ. बद्दल खूप छान व महत्त्वाचे काही सांगून ठेवले आहे. मराठीत ”फटका” या काव्यप्रकारातील प्रसिद‍्ध कवीने तर ”स्नेह्यासाठी पदरमोड कर, परंतु जामीन कोणा राहू नको” असा उपदेशच केला आहे. परंतु आपला एखादा नातलग, मित्र वा परिचित काही कारणांनी, काही गोष्टींसाठी कर्ज काढत असतो व त्या कर्जासाठी आपल्याला जामीन राहण्यास सांगतो. अशा वेळी तो आपला जवळचा मित्र, नातलग असेल (व त्याच्या बद्दल आपले मतही चांगले असेल ) तर त्याला जामीन (गॅरेेंटर) राहणे हे आपले कर्तव्य ठरते. पण त्याच वेळी, काही कारणांनी तो ते कर्ज भविष्यात फेडू शकला नाही तर …? या शक्यतेमध्ये एक संकटही दडलेले असते.

कर्ज रक्कम  जेवढी मोठी तेवढे हे संभाव्य संकट ही मोठे असते. अशा अनेक प्रसंगांत आपले मन सांगते की ”जामीन राहायला पाहिजे” पण बुद्धी सांगत असते ”नको राहूस जामीन” किंवा  ”जरा सांभाळून ”! आणि मग या बाबतीत कधीकधी दोन टोकांच्या भूमिका घेणारी माणसे दिसतात. माझा सी. ए. चा व्यवसाय करताना व बँकेच्या संचालकपदी काम करताना मला अशा अनेक व्यक्ती माहीत झाल्या की ”आम्ही कोणासही, जामीन राहत नाही” हे त्यांचे जाहीर धोरण असते. तर याउलट अशा काही व्यक्ती बघितल्या की त्या ”येथे कोणाहीसाठी जामीन मिळतील” असा जणू जाहिरात फलकच लावून असतात. त्या कोणालाही, कशाहीसाठी बिनधास्त जामीन राहत असतात.

पण ही झाली दोन अजब टोके! यातला योग्य व मध्यम मार्ग काय असावा? जामीन राहताना प्रामुख्याने कुठल्या गोष्टी बघाव्यात, कुठली काळजी घ्यावी याचा अत्यंत थोडक्यात ऊहापोह या लेखात करू या.

1) सगळ्यांत महत्त्वाची पहिली गोष्ट म्हणजे आपण ज्याला जामीन राहणार आहोत त्याची खरोखरच बर्‍यापैकी पूर्ण माहिती (कौटुंबिक स्थिती, व्यवसाय, नोकरी, सवयी, आर्थिक स्थिती इ.) आपल्याला आहे कातसे नसल्यास, अंधारात उडी मारण्यापेक्षा, सुरुवातीलाच ”जामीन राहणे शक्य होणार नाही ” हे स्पष्टपणे सांगावे

(जमल्यास, गोड भाषेत सांगावे).’द बेस्ट टाइम फॉर सेइंग ”नो” इज द फर्स्ट टाइम’ हे अतिमहत्त्वाचे वाक्य लक्षात ठेवावे. एकदा जामीन राहिल्यानंतर कर्जदाराची माहिती मिळवत बसणे म्हणजे ”कन्या देऊनिया मग, कूळ काय विचारावे” अशासारखा प्रकार होतो.

2) ज्याला आपण जामीन राहणार आहोत तो कर्जदार, किती रकमेचे कर्ज घेतो आहे, त्याचा मासिक हप्ता किती असणार व तो भरण्याएवढे त्याचे सध्या उत्पन्न आहे का व भविष्यातही राहील ना, याची अत्यंत नि:संकोचपणे खातरजमा करून घेणे आवश्यक आहे.

 

3) कर्ज कुठल्या कारणासाठी आहे हा मुद्दाही महत्त्वाचा आहे. ज्या कर्जातून कर्जदाराची एखादी मालमत्ता तयार होणार आहे अशी कर्जे जामीनदारांसाठी तुलनेने बरी! मालमत्ता स्थावर असेल तर अजूनच चांगले. तिचे मूल्य सहसा वाढत जाते. कर्ज थकले तर ती मालमत्ता विकण्याचा पहिला पर्याय उपलब्ध असतो. साधी कर्जे, लग्न कार्य वा सणासुदीसाठी काढलेली कर्जे, परदेश प्रवासासाठी काढलेली कर्जे इ. मध्ये कर्जदाराकडे नवीन मालमत्ता तयार होत नसते.

4) कर्जासाठी, कर्जदाराची काय काय मालमत्ता तारण म्हणून ठेवण्यात येणार आहे व तिचे मूल्य काय ते बघावे. प्राथमिक तारण व दुय्यम तारणे यांचे एकत्रित मूल्य कर्ज रकमेहून बर्‍यापैकी जास्त असेल तर भविष्यात कर्जवसुली जामीनदाराकडून होण्याचा धोका कमी.

5) आपण एकटेच जामीनदार आहोत का अजूनही कोणी जामीनदार आहेत ते बघावे, नसल्यास अजूनही कोणाच्या  जामीनदार होण्यासंबंधी आग्रहाने सुचवावे. बाकीचे जामीनदारही तोलामोलाचे आहेत ना, कर्ज थकले तर तेही फेडण्यास मदत करू शकतील ना? ह्याची खात्री करावी. सर्व जामीनदारांकडे एकमेकांची माहिती व ओळख असण्याचे अनेक फायदे असतात.

6) ज्या कर्जासाठी आपण जामीन राहत आहोत त्याचे कर्जमंजुरीपत्र बघावेच. कर्जासाठी कुठल्या शर्ती व अटी आहेत, त्यांची पूर्तता होते आहे ना, हे बघावे व त्या मंजुरीपत्राची एक प्रत आपल्याकडे ठेवावी.

7) जामीनकीच्या कागदपत्रांवर कधीही,”डोळे झाकून”या प्रकारात मोडेल अशा प्रकारे सह्या करू नयेत. ती कागदपत्रे पूर्णपणे वाचून व समजून घेऊन मगच (योग्य वाटल्यास) सह्या कराव्यात. कोर्‍या फॉर्म्सवर सह्या करू नयेत. सर्व मजकूर संपूर्ण भरलेला आहे व तो योग्य आणि बिनचूक आहे हे तपासावे. शक्यतो त्या कागदपत्रांची (व एकूणच त्या कर्जप्रकरणासंबंधीच्या सर्व कागदपत्रांची) एकेक प्रत आपल्याकडे ठेवणे चांगले.

8) अनेक जामीनदार हे कर्जदाराला कर्ज दिले गेले, की त्याविषयी विसरूनच जातात. असे ”ऋणानुबंध” विसरू नयेत. कर्जदार कर्जाचे हप्ते वेळेवर भरतोय ना हे  वर्षातून किमान एकदा प्रत्यक्ष तपासून बघावे. कर्जदार टाळाटाळ करतोय असे वाटल्यास थेट कर्ज देणार्‍या संस्थेकडून माहिती घ्यावी व कर्ज खात्याच्या उतार्‍यांची एक प्रत मागावी. कर्ज थकत चाललंय, कर्जदार ते  फेडण्यासाठी प्रामाणिक प्रयत्नच करत नाहीये असे वाटल्यास, कर्जवसुलीची प्रक्रिया लगेच सुरू करण्याचा आग्रह करावा.

9) कर्जासाठी तारण सांगितलेल्या मालमत्तांची देखभाल, त्यांचा विमा याबाबत कर्जदार जागरूक व नियमित आहे ना हे बघावे आणि मुळात त्यांच्या तारणाबाबत सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत ना? ह्याची खात्री करून घ्यावी. 

10) दुर्दैवाने, कर्ज थकलेच व कर्जवसुली प्रक्रिया सुरू झाली तर त्यात स्वत: जातीने लक्ष घालावे. कर्जदार, अन्य जामीनदार, कर्ज देणारी संस्था या सर्वांना एकत्र आणून सामोपचाराने, एक रकमी परतफेडीने, का अन्य सुयोग्य मार्गाने कर्जफेड होण्यासाठी प्रयत्नशील राहावे. कार्यवाहीच्या तारखांना हजर राहावे. आवश्यकतेप्रमाणे चांगल्या व अनुभवी वकिलाकडून सल्ला घ्यावा. (असे”कॉम्बिनेशन” न मिळाल्यास नुसता अनुभवी वकील चालेल!)

11) प्रत्येक जामीनदार हा वैयक्तिकरीत्या, स्वतंत्रपणे, पूर्ण कर्ज रकमेसाठी बांधील असतो हे जाणून घ्यावे. उदा. रू. 02 लाखांचे कर्ज थकून, त्यावर व्याज लागून 03 लाखापर्यंत गेले आहे व एकूण तीन जामीनदार आहेत तर ते प्रत्येकी एक एक लाखासाठीच जबाबदार आहेत… असे नसते. कर्ज देणारी संस्था, कायद्याने, कोणा एकाकडूनही पूर्ण रक्कम वसूल करू शकते अशी सर्वसाधारण कायदेशीर तरतूद असते व आहे.

 

जाता जाता :— माझ्या ओळखीतील एक बाई त्यांच्या नवर्‍याच्या खूप जवळच्या मित्राला जामीन राहत होत्या. जामीनकीचे कोरे फॉर्मस् समोर ठेवून तो मित्र (त्याचे नाव गणेश) तिला (तिचे नाव वीणा) म्हणाला ”हां, वीणा, ह्यावर जरा पटपट सह्या कर” ते बघून ती म्हणाली,”अरे गणेश, कर्जाची रक्कम तर भर फॉर्ममध्ये” त्यावर गणेशने शांतपणे सांगितले ”वीणा, अजिबात टेन्शन घेऊ नकोस, मी तेवढेच कर्ज घेतो की जेवढे माझ्या जामीनदाराला फेडता येईल”!

घटना सत्य आहे व नावे पण न बदलता लिहिली आहेत. त्या कर्जप्रकरणात पुढे बर्‍याच गमती, ताणतणाव झाले तो सर्व तपशील मात्र इथे लिहू शकत नाही.

- श्री.  उदय कर्वे

डोंबिवली नागरी बँकेचे अध्यक्ष आणि सीए,

साभार: पुनश्च : मराठी सशुल्क डिजिटल नियतकालिक

Wednesday, January 27, 2021

लॉकडाऊन गप्पा : भाग ७: लॉकडाऊननंतर अर्थचक्राला लवकरच गती : श्री. गुणवंत राठी

 कोविडची साथ संपेल आणि आपला देश वेगाने प्रगती करेल. मात्र यापुढे कमाईच्या एकाच स्त्रोतावर अवलंबून राहता येणार नाही. गुंतवणूकही स्मार्टपणे करावी लागेल.

           

संपूर्ण जगात पसरलेल्या ‘कोविड-19’ या महामारीमुळे ‘न भूतो’ अशी परिस्थिती निर्माण झाल्याने सामान्य माणसाची संपूर्ण अर्थव्यवस्थाच कोलमडली आहे. पगारात कपात होणे, नोकऱ्या जाणे, पर्यायी नोकरीच्या संधी नसणे, व्यवसायांमध्ये मंदी येणे अशा परिणामांमुळे सामान्य माणूस अतिशय त्रस्त झाला आहे. परंतु ही तात्पुरती स्थिती आहे. कारण कोविडची साथ लवकरच संपणार आहे आणि भारतीय माणसाची जीवनशैली आणि प्रगती करत राहण्याची सवय पाहता, येत्या काही वर्षांत आपला देश नक्कीच चांगली प्रगती करेल असा मला विश्वास आहे.

दोन प्रकारच्या देशांची प्रगती वेगाने होत असते. एक म्हणजे जे मोठ्या प्रमाणात निर्यात करत असतात आणि दुसरे, जे मोठ्या प्रमाणात खर्च करत असतात. आज आपला भारत हा जगात सर्वाधिक तरुण लोकसंख्येचा देश आहे. जगाच्या एकूण लोकसंख्येच्या तुलनेतही आपल्याकडील तरुणांची संख्या प्रचंड आहे आणि त्यांची मानसिकताही मोकळ्या हाताने खर्च करणारी आहे. शिवाय या २०२० सालात ९०% जनतेला कोविडच्या साथीचा फटका बसल्यामुळे सर्वांचेच डोळे उघडले आहेत.

विविधमार्गी उत्पन्नाची गरज

काही वर्षांपूर्वी निवृत्त झालेल्या लोकांचे शेवटचे मासिक वेतन पन्नास ते साठ हजार रुपये होते, तरीही ते अतिशय समाधानी आयुष्य जगले. याउलट आजच्या तरुणांना पहिलाच पगार ३५ ते ५० हजार रुपये मिळत असूनही किमान जीवनावश्यक गरजा पूर्ण करतानाही त्यांची तारांबळ उडताना दिसते. कारण आतापर्यंत लोक उत्पन्नाच्या कोणत्यातरी एकाच स्त्रोतावर अवलंबून निश्चिंतपणे जगत होते. आता नवीन युगाची सुरूवात विविधतापूर्ण असेल. आता कमाईचे अनेक स्त्रोत असलेले आणि हुशारीने खर्च करणारे लोकच खंबीरपणे पाय रोवून उभे राहू शकतील.

येत्या दोन दशकांत सर्व्हिस सेक्टर म्हणजेच विविध प्रकारच्या सेवा पुरवणारे व्यवसाय सर्वाधिक प्रगती करतील. या क्षेत्रात काम करणारे लोक मोठी झेप घेऊन प्रगत स्थानी स्थिरावतील. व्यवहारांचा वेग वाढेल आणि त्यात मोठ्या प्रमाणात पारदर्शकताही येईल.  हे नवे तंत्र स्वीकारून जगणारेच टिकून राहून प्रगती करतील. त्याच्याशी जुळवून घेऊ न शकणारे मागे पडतील.

व्याज व करात सुधारणा

यापुढे कर रचनेत मोठ्या प्रमाणात सुधारणा होतील. प्रत्यक्ष करसंकलनातही बदल होतील. त्याची पूर्वतयारी म्हणूनच सरकारने राष्ट्रीयीकृत बँकांचे मोठ्या प्रमाणात विलीनकरण सुरू केले आहे. देना बँक आणि विजया बँक यांचे बँक ऑफ बडोदामध्ये विलीनीकरण झाले आहे, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया यांचे पंजाब नॅशनल बँकेत विलीनीकरण करण्यात आले आहे. देशात इतकी वर्षे २५ हून अधिक राष्ट्रीयकृत बँका कार्यरत होत्या, विलीनीकरण पूर्ण झाल्यानंतर मोजक्याच राष्ट्रीयीकृत बँका संपूर्ण देशात कार्यरत असतील. 

बँकांतील मुदत ठेवींवरील व्याजदर आत्ताच ५% ते ६% पर्यंत घसरले असून यापुढेही ते कमी होत जाणार आहेत. त्यामुळे फिक्स डिपॉझिटमध्ये दीर्घकाळ पैसे अडकवून ठेवण्याचे प्रमाण खूप कमी होत जाईल. त्याच वेळी पूर्वीच्या तुलनेत कर्जही स्वस्त दराने उपलब्ध होईल.

काही महत्त्वाच्या सूचना:

१. दरमहा एक ग्रॅम सोन्याची खरेदी करा.

२. इंडियन इक्विटी मार्केटकाही महत्त्वाच्या सूचना:

१. दरमहा एक ग्रॅम सोन्याची खरेदी करा.

२. इंडियन इक्विटी मार्केटमध्ये मजबूत मूल्य असलेल्या शेअर्समध्ये गुंतवणूक करा.

३. सध्या नकारात्मक परतावा दिसत असला तरीही एसआयपीमधील गुंतवणूक सुरू ठेवा.

४. कोणत्या शहरात कोणत्या परिसरातील रिअल इस्टेटमधील गुंतवणूक फायदेशीर ठरेल याचा दूरदर्शीपणे विचार करा.

श्री. गुणवंत राठी

३. सध्या नकारात्मक परतावा दिसत असला तरीही एसआयपीमधील गुंतवणूक सुरू ठेवा.

४. कोणत्या शहरात कोणत्या परिसरातील रिअल इस्टेटमधील गुंतवणूक फायदेशीर ठरेल याचा दूरदर्शीपणे विचार करा.

 

येत्या चार वर्षांत म्हणजे २०२४ पर्यंत सोन्याचा दर प्रतितोळा (दहा ग्रॅम) एक लाखाच्या वर, तर चांदीचा दर येत्या वर्षभरातच म्हणजे २०२१ पर्यंत प्रति किलो एक लाखाच्या पुढे जाण्याची शक्यता आहे.

 

लॉकडाऊन गप्पा : भाग ६: लॉकडाऊन आणि आनंददायी शिक्षण : डॉ. रुपाली कुलकर्णी

 
१५ मार्च २०२० पासून कोरोना प्रादुर्भावाच्या नियंत्रणासाठी महाराष्ट्रातील शाळा बंद करण्यात आल्या आहेत. शाळा नियमित वेळेवर सुरु न झाल्याने  विद्यार्थी व पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. काही शाळांतून तासन तास व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून ऑनलाईन शिक्षण सुरू झाले तर काही शाळांमधून व्हाट्सअप आणि यूट्यूब सारख्या माध्यमातून म्हणजे मेसेंजिंग आणि व्हिडीओ अशा  माध्यमातून शिक्षण सुरू झाले आहे.  या शिक्षण पद्धतीमध्ये पालकांचीही भूमिका महत्त्वाची ठरत आहे. अशा परिस्थितीत सर्वच पालक आपापल्या परीने, विविध विषयांच्या शिक्षणावर तोडगा काढताना दिसत आहे. विषय सोपा करून सांगण्यासाठी कुठले माध्यम , खेळ , उपक्रम, प्रयोग उपयुक्त ठरतो आहे याबद्दलच्या संकल्पनांची  पालकांमध्ये देवाण घेवाण सुरु आहे. 

अशात  आम्ही काही मैत्रिणींनी मिळून मराठी भाषा शिक्षणाचा असाच एक प्रयोग आमच्या प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या पाल्यांसाठी केला.  सर्वप्रथम मराठी भाषा शिक्षण द्यायचे म्हणजे काय यावर ऊहापोह केला. तेव्हा असे लक्षात आले की  भाषा शिक्षणामागील हेतू हा मुलांचा शब्दसंग्रह वाढविणे, नवीन शब्दांविषयी त्यांना योग्य ते आकलन होणे, त्याद्वारे त्यांची संवाद साधण्याची कला तसेच विचार करण्याची क्षमता वाढीस लागणे असे असायला हवे. मग हे हेतू साध्य करण्यासाठी दुसरी-तिसरीच्या मुलांसमोर आपण असे काय खाद्य ठेवले पाहिजे ज्याचा ते आनंदाने, सहज  वृत्तीने स्वीकार करतील असा विचार आम्ही केला आणि "कविता" हे मुलांच्या आवडीचे माध्यम निवडले.  सुंदर ताल, नाद, ठेका असणाऱ्या कविता मुले सहजपणे गुणगुणायला लागतात, त्यातील  शब्दांचा अन्वयार्थ लावण्यात सुरुवात करतात हा अनुभव पाठीशी होताच.  तेव्हा, मुलांसमोर हा  बालसाहित्याचा अमूल्य ठेवा उलगडण्यासाठी  आम्ही एक ऑनलाईन उपक्रम घेण्याचे ठरविले आणि "कविता मनातल्या" या कार्यक्रमाचे आयोजन केले! मराठी भाषेमध्ये कित्येक श्रेष्ठ, ज्येष्ठ, अनुभवी रचनाकारांनी बालसाहित्य निर्मिले आहे.  कवयित्री शांता शेळके, कविश्रेष्ठ कुसुमाग्रज.  विं. दा.  करंदीकर, मंगेश पाडगावकर, कवी ग्रेस  आदींमार्फत उत्तमोत्तम बालकविता रचल्या गेलेल्या आहेत शिवाय त्या चालबध्द केल्यामुळे गेय स्वरूपात त्यांची गाणी देखील उपलब्ध आहेत.  अशाच काही  बालकविता आम्ही मुलांना सुचविल्या, त्या म्हणून दाखवायला, ऐकवायला सुरुवात केली आणि मग त्या सुंदर तालबद्ध केलेल्या कवितेच्या माध्यमातुन  मुले नवीन शब्द, भावनांच्या व्यक्त करणाच्या पद्य-पद्धती   सहजपणे शिकू लागली. कवितांनी  मुलांच्या मनावर गारुड केले.  काहींनी त्या पाठ करून  साभिनय सादरीकरण केले, काही मुलांनी आपल्याला येत असणाऱ्या वाद्यांवर त्या वाजविल्या तर काही मुलांनी त्यावर नृत्य करणे पसंत केले.  विशेष म्हणजे मुलांनी स्वतःहून रस दाखवित, कल्पकता लढवत  उत्साहाने कार्यक्रमाची तयारी केली.   मुलांची तयारी झाल्यावर मुलांच्या पालकांकडून आम्ही त्या कवितांचे व्हिडिओ मागविले  आणि मग तयार झाला "कविता मनातल्या " कार्यक्रमाचा युट्युब प्रीमिअर !! सर्वच मुले उत्कंठतेने प्रिमिअरची वाट बघत होती. त्या  प्रीमिअरचा  सगळ्या मुलांनी, घरातील सर्व कुटुंबियांसोबत आनंद घेतला. कित्येक दिवसांनंतर आपल्या वर्गमित्रांना असे डिजिटली भेटणे मुलांना जाम आवडले.  युट्यूब वरील हा व्हिडिओ मुलांनी  पुनः पुनः पाहिला आणि आता तर आपल्याशिवाय आपल्या इतर मित्रवर्गाने सादर केलेल्या जवळपास १७ कविता, आठवड्याच्या कालावधीतच मुलांना मुखोदगत झालेल्या आहेत.  या  युट्युब प्रीमिअर उपक्रमाचे अनेक मान्यवरांनी, भाषा तज्ज्ञांनी  कौतुक केले आहे. हा व्हिडिओ पुढील लिंकवर उपलब्ध आहे. https://www.youtube.com/watch?v=PEDn8UoPWkM
         
या अशा कार्यक्रमाच्या माध्यमातुन आम्ही पुढील हेतू साध्य करण्यास सफल ठरलो. १) कवितांच्या माध्यमातून मुलांचा शब्दसंग्रह वाढविणे, २) विविध भावना व्यक्त करणेसाठी कवितेच्या माध्यमाचा उपयोग, ३) मराठीतील संपन्न  बालसाहित्याची ओळख, ४) प्रभावी सादरीकरण पद्धती, ५) मुलांच्या कल्पकतेला चालना  इ.  
शैक्षणिक टाळेबंदीचा कालावधी किती लांबणार आहे त्याची आपल्याला कल्पना नाही. पण तो पर्यंत शिक्षण जास्तीत जास्त आनंददायी कसे करता येईल यावर मात्र कल्पक उपाय शोधत राहिले पाहिजे. बघुया, काय काय समोर येतेय ते !!   

                                                                                    - डॉ. रुपाली कुलकर्णी,



लॉकडाऊन गप्पा : भाग ५: लॉकडाऊन.. मंदीतही संधी : डॉ. रुपाली कुलकर्णी

 COVID -१९ अर्थात करोना विषाणू मुळे जगभर सुरु झालेल्या महामारीला तोंड देण्यासाठी भारतात २५ मार्च २०२० रोजी, २१ दिवसांचा पहिला लॉकडाउन जाहीर झाला. प्लेग सारख्या जीवघेण्या साथीचा काळ अनुभवलेली बुजुर्ग पिढी सोडली तर सगळ्यांच्याच  जीवनात ही अभूतपूर्व स्थिती पहिल्यांदाच उभी ठाकली. जीवनावश्यक सेवा वगळता रोजगार-व्यवसायाची सर्वच क्षेत्रे ठप्प पडली.  नोकरदार वर्ग असो की व्यावसायिक, रोजंदारीवर काम करणारा कष्टकरी वर्ग असो की घरेलू कामगार, 'काम बंद' संकटामुळे प्रत्येकाचेच धाबे दणाणले.  'पण हरकत नाही, जीवावर बेतणारे संकट आहे तर तीन आठवड्यांचा कालावधी विना-काम निभावून नेऊ' अशी मनाची समजूत काढूणाऱ्या प्रत्येकालाच तेव्हा यत्किंचितही कल्पना आली नाही की आरोग्यावरचे हे संकट, असे तीन महिन्यांचा कालावधी होऊन गेल्यावरही अजून 'जैसे थे' च आहे.

सुरुवातीच्या कालावधीसाठी काही व्यावसायिकांना आर्थिक नुकसानाची झळ सोसूनही कामगारांना पूर्ण किंवा अर्धे वेतन देता आले. परंतु जसजसा लॉकडाउनचा कालावधी वाढतो आहे प्रत्येक वर्गाच्या आर्थिक नुकसानीचा आलेख वाढतच चाललेला आहे. त्याचा परिणाम म्हणून बऱ्याच उद्योगक्षेत्रांमध्ये  कर्मचारी वर्गास  'तात्पुरता विना -वेतन ब्रेक' किंवा 'कॉस्ट कटींग' चा  भाग म्हणून नोकरीही गमविण्याची वेळ आलेली आहे. अशात ही परिस्थिती भविष्यात किती काळापुरती राहणार आहे हेही स्पष्ट नसल्याने बहुतांश  कुटुंब प्रमुखांद्वारे चरितार्थ चालविण्यासाठी,  उत्पन्नाच्या प्रमुख स्रोतावरचे अवलंबित्व संपविण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी  दुय्य्म उत्पन्नाच्या  अनेक मार्गांचा धांडोळा घेण्यास सुरुवात केलेली आहे. त्यावरच थोडासा उहापोह !  
सर्वप्रथम लॉकडाऊन मुळे कोणत्या घटकांवर किंवा त्यांच्या उप्लब्धतेवर मर्यादा आलेल्या आहेत त्याचा विचार करूयात म्हणजे मग या मर्यादा लक्षात घेऊन नवीन उद्योग क्षेत्राची / रोजगार संधीची निवड आणि त्यासाठी  नियोजन  करता येईल. यातील काही घटक म्हणजे  माल-वाहतुकीवरील अनिश्चितता  पर्यायाने मालाची अनुपलब्धतता / तुटवडा, कुशल कारागीर /मजूर यांची अनुपलब्धतता, प्रवास करण्यावर मर्यादा, सामाजिक सम्मेलन / एकत्रित येण्यावर मर्यादा, संचारबंदीच्या वेळा, परिस्थितीमुळे लोप पावलेल्या सुविधा अथवा उत्पन्न संधी इ. या बाबी लक्षात घेतल्या  तर  आपण निवड करायच्या  नवीन उद्योग क्षेत्रामध्ये  कुठले उप्त्पादन घेता येईल  किंवा कुठल्या प्रकारच्या सेवा पुरविता येतील हे  ठरविणे सोपे जाईल.  हे ठरवितांना तुमच्या  स्वतःच्या आवडी/रस (Interests), अंगभुत गुणकौश्यले (Skillsets), तुमच्याकडे उपलब्ध पायाभूत सुविधा-Infrastructure (जागा, वीज, पाणी इ.)  लक्षात घेणेही तितकेच महत्वाचे आहे.  आता  वरील घटकांचा आणि संभाव्य ग्राहकवर्गाचा ताळमेळ बसविण्यासाठीप्रत्येक घटकाचा स्वतंत्रपणे विचार करून  काही रोजगार संधी शोधता येतेय का ते बघुयात.
१)  घटक: घटक: प्रवास करण्यावर मर्यादा, सामाजिक सम्मेलन / एकत्रित येण्यावर मर्यादा : या घटकाचा विचार केल्यास, अशा सेवेचा किंवा सुविधेचा विचार करा ज्याचा लाभ  संभाव्य ग्राहकवर्ग घरबसल्या घेऊ शकेल. उदाहरणार्थ ऑनलाईन शिक्षण/मागर्दर्शन ! पहिल्या लॉकडाऊन पासून, आता तीन महिने झाले आहेत आणि    शाळा, महाविद्यालये बंद आहेत. जुलै महिन्याची सुरुवात म्हणजे पुढचे शैक्षणिक वर्षही चालू झाले आहे. तेव्हा घरी बसूनच विद्यार्थ्यांचा पुढील आभ्यास सुरु झाला आहे. जर तुमच्याकडे एखाद्या विषयाचे सुयोग्य ज्ञान असेल आणि  ऑनलाईन शिकविण्यासाठी आवश्यक ती साधने, कौश्यले असतील तर  ऑनलाईन ट्युशन्सचा या सेवेचा मार्ग उत्तम ठरतो. बैजू, अन-अकॅडेमी सारख्या स्टार्टअप्सना आज किती यश लाभले आहे ते आपल्याला विदित आहेच. या यशामागे त्यांच्या तज्ञ् शिक्षकवर्ग आणि प्रभावी प्रेझेन्टशन पद्धती काम करते. शिवाय अशा प्रकारची सेवा पुरविताना विषयाचे बंधन रहात नाही. तांत्रिक विषयांपासून ते कला क्षेत्रापर्यंत शिक्षणास ऑनलाईन घेण्यास मागणी असणार आहे. तांत्रिक विषयां अंतर्गत शैक्षणिक विषय, कॉम्प्युटर प्रोग्रामिंग, संशोधन मार्गदर्शन,  विशेष  अभ्यासक्रम जसे शेअर मार्केट, विमा/ अर्थ सल्लागार, डिजिटल मार्केटींग आदी सारख्या विषयांचा अंतर्भाव होईल. परदेशांप्रमाणेच वाद्यसंगीत, नृत्य, पाककला, हस्त/ चित्रकला या सारख्या कलांचे शिक्षणही ऑनलाईन देता येईल. तुमच्या ऑनलाईन शिक्षणक्रमाचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी 'सोशल मीडिया'/'डिजिटल मार्केटिंग' चा अवलंब करता येईल.    
२) घटक: परिस्थितीमुळे लोप पावलेल्या सुविधा: लॉकडाऊन मध्ये मेस, हॉटेल्स या सुविधांवर गंडांतर आले आणि  बाहेरगावी राहणारे नोकरदार, विद्यार्थी यांच्या उदरभरणावर संकट उभे राहिले. हेच कशाला गेल्या तीन महिन्यांमध्ये, घरेलू कामगार वर्गाच्या अनुपस्थितीत आणि घरात सदासर्वकाळ उपस्थित (अतिरिक्त) माणसांमुळे घरच्या अन्नपूर्णेचा स्वयंपाका-कामामुळे पिट्ट्या पडलेला आहे. अशावेळी घरगुती निगुतीने बनविलेल्या चविष्ट, सात्विक अन्नास मागणी वाढलेली आहे. जर तुमच्याकडे उत्तम पाक कौशल्य, व्हाट्ससप्प किंवा तत्सम मार्केटींग कला आणि भरपूर माणसांचे नेटवर्क असेल तर पार्सल-फूड आउटलेट चालविणे हा ही एक उत्तम पर्याय ठरू शकतो. ओळखीच्या व्यक्तीकडे स्वयंपाका-कामामध्ये जपली जाणारी स्वच्छता आणि हातची रुची ज्ञात असल्याने अशा व्यक्तींना जर रुचीपूर्ण खाद्यपदार्थ पुरविता आले तर थोड्या कालावधीत या व्यवसायाची चांगली ओळख निर्माण होते असा अनुभव आहे. घरगुती साठवणुकीचे पदार्थ जसे मसाले, पापड,लोणची, खाकरे, बेकरीचे पदार्थ, आईसक्रीम, केक अशा एक किंवा अनेक वस्तू वस्तूंचे विशेष आउटलेट चालविता येईल.            
३) घटक: परिस्थितीजन्य उत्पन्न संधी: असे म्हणतात की खरा व्यावसायिक मंदीतही संधी शोधू शकतो. देश पुढील काही काळ हा आर्थिक मंदीतून जात असताना त्यावर मात करण्यासाठी नवनवीन उत्पादने आणि सेवा यांचा उदय होण्याचा हा काळ आहे. नोकरी व्यवसायातील अनिश्चितता, भविष्यात उभ्या असलेल्या आर्थिक विवंचना यामुळे  मानसिकरीत्या खंबीर नसलेले लोक निराशेच्या गर्तेत ढकलले जात आहेत. वाढते नैराश्य, आत्महत्यांचे प्रमाण बघता  ऑनलाइन समुपदेशन करणाऱ्यांची आवश्यकता भासणार आहे. लोकांचे मनोधैर्य वाढविणे, प्राप्त परिस्थितीतून त्यांना योग्य मार्ग दाखविणे असे समुपदेशन करणेही महत्त्वाचे ठरणार आहे. परिस्थितीमुळे व्यायामशाळा, जॉगिंग पार्क हे बंद असल्याने ऑनलाइन योगासने वर्ग, मेडिटेशन वर्ग, मुद्रा-अभ्यास वर्ग  यांनाही चांगली प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.  ज्यांच्याकडे ही अंगभूत कौशल्ये आहेत ते  या मंदीतही त्याचे रूपांतर रोजगार संधीमध्ये करू शकतात. लॉकडाउनच्या कालावधीमध्ये घरातून न बाहेर पडण्याच्या सूचना प्रशासनामार्फत जाहीर होत असतात. तसेच घरातल्या सदस्यांच्या आरोग्याची चिंताही गृहिणीला भेडसावत असते. अशावेळी घरपोच भाजीपाला व किराणा-माल पोहोचवणाऱ्या सेवा सुविधांचा जास्तीत जास्त लाभ घेतला जातो. त्यात नावीन्य आणून (जसे निवडलेला भाजीपाला, पूजेसाठी फुले, स्टेशनरी वस्तू इ.) घरपोच ग्रोसरी सेवेचा संधी म्हणून विचार करता येईल. थोडा ‘आउट ऑफ बॉक्स’ विचार करुन  लॉकडाऊन मुळे घरात अडकून पडलेल्या सर्व वयोगटातील सदस्यांना काही नाविन्यपूर्ण सेवा पुरविता येवू शकते. उदाहरणार्थ  ज्येष्ठांसाठी ‘वाचनालय तुमच्या दारी’ सेवा, ‘घरपोच औषधे पुरवठा’ सेवा,  लहान मुलांसाठी ‘हस्तकला/मूर्तीकला कीट’ निर्मिती व सेवा, गृहिणींसाठी ‘घरगुती ब्युटीपार्लर सेवा’, मास्क शिलाई, सेनिटायझार निर्मिती’,  इ. संधी शोधू तितक्या सापडतील !                                      
 ४) घटक: मालाची अनुपलब्धतता / तुटवडा: हा घटक विचारात घेतला तर त्याला थोडी नियोजनाची जोड झाली द्यावी लागेल. साथीमुळे निर्बंध वाढले तर बरेचसे शेतकी उत्पादन  वाया जाऊ शकते. जसे या वर्षी आंब्यांची आवक  भरपूर होती परंतु विक्री करते वेळी संचारबंदी लागू झाल्याने हव्या त्या प्रमाणात विक्री होऊ शकली नाही.  आणि म्हणून  प्रक्रिया व शीत-साठवणूक उद्योग यांमध्ये संधी शोधता येईल. उदाहरणार्थ, आमरस हा सर्वांच्या आवडीचा पदार्थ सर्व ऋतूत उपलब्ध व्हावा म्हणून त्यावर प्रक्रिया करुन त्याची साठवणूक करणे व मागणीनुसार पुरवठा करणे. भविष्यातील विविध वस्तूंचा मागणी व पुरवठा लक्षात घेऊन प्रक्रिया व साठवणूक उद्योगास चालना मिळू शकते.
अर्थात हे सगळे झाले मध्यमवर्गीय नोकरदार किंवा व्यावसायिक यांविषयी. पण ज्यांचे हातावर पोट आहे असे मजूर,घरेलू कामगार त्यांनाही अशा काही निश्चित वाटा शोधण्यासाठी मदत करायला पाहिजे. अशाप्रकारे ‘मंदीतही संधी’ शोधता येईल. त्यासाठी गरज आहे ती पुरेसा आत्मविश्वास, अंगभूत कौशल्यांना योग्य दिशा देण्याची इच्छाशक्ती, थोडीशी कल्पकता आणि  नाविन्याची, तंत्राज्ञानाची जोड देण्याची कला !! काय सांगता यावे, कदाचित अपरिहार्य म्हणून स्वीकारलेला रोजगार मार्ग तुमच्या जीवनाला नवीन, भक्कम  कलाटणी देवू शकेल! करा विचार, लागा कामाला !! Best Luck !!
-  डॉ. रुपाली कुलकर्णी,
  ट्रेनिंग हेड
 SWS Financial Solutions Pvt. Ltd.

लॉकडाऊन गप्पा : भाग ४: लॉकडाऊन आणि आरोग्य विमा : श्री. रघुवीर अधिकारी

 सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात, शरीराप्रमाणे मनालाही  स्वास्थ्यपूर्ण, सकारात्मक ठेवण्यासाठी विविध संस्थामार्फत अनेक उपयुक्त वेबिनार्स, झूम मिटींग्स यांचा अवलंब सुरु आहे.  जिम्स, जॉगिंग पार्क्स बंद असल्याकारणाने, घरबसल्या आपले आरोग्य कसे स्वस्थ ठेवावे, या विषयावर मीही एक वेबिनार अटेंड केला. सुरुवातीला संवादकर्त्याने काही प्रश्न विचारले होते ज्यापैकी दोन असे होते: ‘तुमच्या दीर्घायुषी, सुखी आयुष्यासाठी सर्वाधिक महत्वाचा भाग कोणता ? ‘ आणि ‘तुमच्या आयुष्यात तुम्ही कोणाला पाहिली प्रायोरिटी देता?’. या प्रश्नांची उत्तरे बहुतांश जणांनी ‘आरोग्य’ आणि ‘कुटुम्ब’ अशी दिली. अर्थात, ही उत्तरे येणे तर साहजिकच होते. परंतु, आर्थिक सल्लागार म्हणून काम करणाऱ्या मला यातील विरोधाभास मात्र चटकन जाणवला.  तोच आज तुमच्यासमोर मांडीत आहे.

‘आपले आरोग्य’ आणि ‘आपले कुटुंब’ ह्या दोन्ही गोष्टी प्रत्येक व्यक्तीस महत्वाच्या वाटणे स्वाभाविकच आहे.  यामध्ये कुटुंबाच्या आरोग्यासंदर्भात आपल्याला दोन पातळ्यांवर विचार करावा लागेल: शारिरीक आणि आर्थिक ! ‘आपले आणि कुटुंबाचे शारीरिक पातळीवरील आरोग्य कसे राखावे’, हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न असल्याने आज आपण वैयक्तिक / कुटुंबाच्या स्वास्थ्याचा, आर्थिक दृष्टीकोनातून विचार करूयात! या दृष्टीकोनातून विचार करताना असे जाणवते की स्वतःचा आणि कुटुंबियांचा यथोचित  आरोग्यविमा काढणे या बाबीकडे  बहुतांश जण साफ किंवा सोयीस्करपणे दुर्लक्ष करत असतात. म्हणजे एकीकडे म्हणायचे की ‘मला माझे स्वास्थ्य सर्वात महत्त्वाचे आहे’, पण स्वास्थ्य विमा (Health Insurance) किंवा अपघात विमा(Accident Insurance) हा काढायचाच नाही. तसेच ‘माझे कुटुंब मला अगदी महत्त्वाचे आहे’, असे म्हणायचे पण कुटुंबातील व्यक्तींचा योग्य तो स्वास्थ विमा घ्यायचाच नाही. आहे ना किती विरोधाभासी? दोन उदाहरणे घेऊन समजावून घेवूयात!
 
माननीय पंतप्रधानांनी १५/८/२०१८ रोजी आयुष्यमान भारत योजना जाहिर केली. १५/४/२०२० च्या सरकारी आकडेवारी प्रमाणे आत्तापर्यंत १२.४५ कोटी ई-कार्ड देण्यात आलेले आहेत. सरकारी आकडेवारीप्रमाणेच ह्या योजनेचा लाभ आपल्या समाजातील तळागाळातील साधारणत: ५० कोटी लोकांनी घ्यायला हवा आहे. हे आकडे पुरेसे बोलके आहेत. म्हणजे ज्यांना खरोखर गरज आहे अशी ३७/३८ कोटी एवढी प्रचंड लोकसंख्या आरोग्याशी संबंधित या महत्त्वाच्या योजनेपासुन वंचित आहे. तळागाळातील या            ५० कोटी लोकसंख्येव्यतिरिक्त उरलेल्या ८० कोटी जनतेने आपला स्वास्थ्य विमा वैयक्तिक पातळीवर घेणं अपेक्षित आहे. अर्थातच या ८० कोटी लोकसंख्येमध्ये सरकारी कर्मचारी, संघटित क्षेत्रात काम करणारे आणि सैन्यदलातील कर्मचारी ह्यांचा स्वास्थ्य विमा हा असतोच त्यामुळे त्यांना वगळल्यानंतर उरलेल्या लोकांची परिस्थिती ही तळागाळातल्या लोकांपेक्षा थोडीशी बरी आहे असे म्हणतां येईल का, हा खरतर प्रश्नच आहे कारण येथेही जवळ जवळ ४५ कोटी लोकांचा स्वास्थ्य विमाच नाहीये ! आणि ज्यांचा विमा आहे त्यांना तो विमा पुरेसा आहे का? असा प्रश्न जर विचारला तर मला वाटते की ५०% पेक्षा जास्त लोकांचे उत्तर हे नकारार्थी असणार आहे. 
दुसरे उदाहरणही तितकेच बोलके आणि नागरिकांची विम्याबाबतची उदासीनता अधोरेखित करणारे आहे. ‘प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना’ ह्याबद्दल बोलूयात. ही योजना १८ ते ७० या वयोगटातील सर्वांसाठी उपलब्ध आहे ज्यात अट फक्त एकच आहे – धारकाचे बॅंकेत खाते हवे. अपघाती मृत्यू आणि संपूर्ण अपंगत्वसाठी रुपये २ लाख आंशिक अपंगत्वासाठी रुपये १ लाख रक्कमेच्या इतक्या विम्यासाठी  वार्षिक हप्ता फक्त रुपये १२ इतका आहे! हा हप्ता विमा धारकाच्या बँक खात्यातून ‘ऑटो डेबिट’ सुविधेद्वारे वर्ग होतो. संपूर्ण जगामध्ये अद्वितीय ठरावी अशी ही योजना आहे. परंतु या योजनेमध्ये फक्त १६ कोटी इतक्याच जनतेने आपले नाव नोंदवले आहे. खरेतर  आज भारत्तात १८ ते ७० या वयोगटात साधारणत: ९५ कोटी एवढी मोठी लोकसंख्या आहे.  याचाच एक अर्थ असा होतो की अजुनही बॅंकेत खाते न उघडणाऱ्यांची संख्या काही कोटीमध्ये आहे. शिवाय भारत हा तरुणांचा देश आहे म्हणजेच  विम्याची गरज असणारा वर्ग हा अधिक प्रमाणात आहे. तरिही दिसणारी ही उदासीनता पाहून भारतातील आर्थिक निरक्षरतेचे प्रमाण हे फार मोठे आहे असे दिसते. यातून दुसरा अर्थ असाही निघतो की यामध्ये कदाचित काहीजण असे असतील की ज्यांना फक्त १२ रूपयांमध्ये मिळणारे हे २ लाखाचे विमा कवच गरजेचे वाटणार नाही – उदाहरणार्थ उच्च उत्पन्न गटात मोडणारे आणि स्वत:च सजग राहुन योग्य असा विमा घेणारे नागरिक. परंतु ९५ कोटींमध्ये ही संख्या किती असेल हे सांगण्यासाठी कोणत्याही तज्ञाची आवश्यकता नाही. 
यावरून ‘आपल्याला सर्वाधिक महत्वाच्या वाटणाऱ्या ‘आरोग्य’  आणि ‘कुटुम्ब’ या संकल्पनांबाबत आपण खरेच जागरूक आहोत का ? स्वतःच्या  आणि कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी, ‘सुयोग्य विमा’ या दृष्टीकोनातून,  कुटंबातील एक कर्ता व्यक्ति म्हणून मी घेतो / घेते का?’, ह्या प्रश्नांवर प्रत्येक वाचकाने अंतर्मुख होऊन विचार व कृती करण्याची गरज आहे. या कोरोना साथीच्या काळात प्रत्येकजण आपले आरोग्य जपत आहे. केंद्र/राज्य सरकार तर्फे दिल्या जाणाऱ्या स्वच्छतेच्या सर्व उपायांचे अवलंब करताना दिसत आहे. आणि हे सगळे का, तर मी आजारी पडू नये किंवा कुटुंबातील व्यक्ती आजारी पडू नये म्हणून ! चांगलेच आहे... पण आपल्या कृतीला दूरदृष्टीचा आयाम देण्याचीही आवश्यकता आहे. म्हणजे तहान लागल्यावर विहीर खोदण्यापेक्षा, त्यापुर्वीच आपल्या स्वतःसह, सर्व कुटुंबियांचा योग्य तो आरोग्य विमा आपण का काढत नाही? ‘कोरोना व्हायरसने संक्रमित होणे’ यासाठी  ‘व्हायरल इन्फेक्शन’ या मुद्द्या अंतर्गत मेडिक्लेम पॉलिसीमध्ये कव्हर आहे. पण,  ‘मला असले काहीही होणार नाही’ या भ्रमात असणाऱ्या व्यक्तींनी स्वास्थ्य विमा घेतलेला आहे का? हे पडताळून पहावे. दुर्दैवी परिस्थीतीत, अकल्पित उभ्या ठाकलेल्या खर्चानी तुमचे सर्व आर्थिक नियोजन कोलमडू शकते हे लक्षात घायला हवे. लॉकडाऊनच्या काळात आपले कितीतरी खर्च हे बाजूला पडले आहेत. यात विकेंड – सिनेमा, आऊटींग, हॉटेलिंग,शॉपिंग, पेट्रोल-खर्च जवळपास शून्य झाले असतील. शिवाय केंद्र  सरकारने तर कर्ज हफ्त्यांनाही तीन महिन्यांसाठी सवलतही दिलेली आहे. मग या बाजूला पडलेल्या रक्कमेचा योग्य उपयोग करून आता तरी ज्या स्वास्थ्याला, कुटुंबाला तुम्ही सर्वाधिक महत्व देता त्यासाठी आरोग्य विमा घेण्याचे पाउल उचलणार का?  
साडेतीनशे वर्षापूर्वी, राजकीय राजवटीत जेव्हा जनता भयभीत झाली होती, तेव्हा श्री समर्थांनी आपले बाहू उभारून, खणखणीत वाणीने लोकांना सांगितले –

धिर्धरा धिर्धरा तकवा । हडबडूं गडबडूं नका ।
केल्याने होत आहे रे । आधी केलेचि पाहिजे ॥

येणारी संकटे आपल्याला बरेच काही शिकवून जात असतात. त्यापासून शिकवण घेऊन, आपण आपल्यामध्ये बदल करण्यास शिकले पाहिजे. कोरोनाच्या संकटामुळे आपण विम्याच्या आयामात येणाऱ्या आर्थिक शिस्तीबाबतही सजग झालो तर हा बदल स्वागतार्हच ठरेल.  आपल्या आर्थिक नियोजनामध्ये, कोरोना- लॉकडाऊनमुळे उदधृत झालेला हा बदल, आपण यथायोग्य स्वीकाराल ! हडबडून- गडबडून न जाता योग्य निर्णय घ्याल! तोपर्यंत, घरीच रहा , सुरक्षित रहा !               


               - श्री. रघुवीर अधिकारी,
मुख्य कार्यकारी संचालक.