Friday, November 23, 2018

पॅन कार्ड चे महत्व: श्री. ऋषभ सोनवणे



पॅन कार्ड म्हणजे पर्मनंट अकाउंट नंबर. पॅन क्रमांक म्हणजे भारतीय नागरिकाची ओळख. यात दहा आकडी क्रमांकामध्ये अक्षरे व अंकांची जळवणुक असते. भारतीय आयकर कायदा 1961, अंतर्गत सर्व भारतीयांना पॅन आयकर विभाग देतो. यासाठी केंद्रीय कर मंडळांतर्गत तरतूद आहे. भारतीयांप्रमाणे परदेशी नागरिकांना ही दिले जाते. पण त्यासाठी आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करावी लागते.आर्थिक व्यवहार करताना असणे गरजेचे आहे प्रत्येक व्यक्तीचे केवळ त्याच व्यक्तीची ओळख असते.

पॅनकार्डचा उपयोग हा विविध ठिकाणी केला जातो.आयकर विवरण (रिटर्न) भरताना,टीडीएस दाखवताना, टीडीएस चा परतावा मागताना,आयकर विभागाबरोबर कोणताही पत्रव्यवहार करताना तसेच कोणतीही आर्थिक गुंतवणूक करताना पॅन कार्ड गरजेचे आहे. बँक खाते उघडायचे झाल्यास, टेलिफोनची नवीन जोडणी हवी असल्यास,मोबाईल नंबर हवा असल्यास, परकीय चलन खरेदी करताना किंवा पन्नास हजारापेक्षा जास्त रक्कम बँकेत ठेवताना वा काढताना, नवे वाहन खरेदी करताना इत्यादी व्यवहारांसाठी पॅन कार्ड असणे गरजेचे आहे.


तुम्हाला पॅन कार्ड नसल्यामुळे व त्याचा गैरवापर झाल्यामुळे झालेल्या मानसिक,  शारीरिक तसेच आर्थिक त्रासाबाबत माझा अनुभव सांगतो.

नाशिक शहरात सत्तर ते ऐंशीच्या दशकात एक प्रसिद्ध वकील होऊन गेले. त्यांच्या कुटुंबात ते, त्यांची पत्नी व दोन मुले असा छोटासा परिवार होता.त्यांची व त्यांच्या पत्नी, या  दोघांची बँकेत फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतवणूक होती. दोघेजण आर्थिकदृष्ट्या साक्षर असल्यामुळे त्यांनी आपल्या गुंतवणुकीला वारस नमूद केला होता. त्यांच्या पत्नीने दुसऱ्या मुलाला त्यांच्या गुंतवणुकीला वारस म्हणून नमूद केले होते. परंतु मुलगा उच्च शिक्षणाच्या देशाने परदेशी गेला व तो तिथे स्थायिक झाला. आईवडिलांबरोबरचे  संबंध मुलाने जोपासले परंतु त्याचा भारतातील व्यवहारांशी  काहीही संबंध नव्हता.कालांतराने या दाम्पत्याचे निधन झाले. त्यांच्या जाण्यानंतर, त्या गुंतवणूकीबद्दल काय करायचे असा प्रश्न बँकेसमोर जेव्हा उभा राहिला तेव्हा त्यांनी त्यांचे वारस असलेल्या त्यांच्या मुलाला संपर्क साधला व गुंतवणुकीवर हक्क प्रस्थापित करण्यासाठी त्यांना काही कालावधीत  आवश्यक ती कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी कळविले. त्यासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांमध्ये पॅनकार्ड सर्वात महत्वाचे होते. परंतु शिक्षणासाठी परदेशी गेल्यानंतर, त्या मुलाचा भारतात आर्थिक व्यवहारांशी कुठल्याही प्रकारचा संबंध नव्हता. त्यामुळे पॅनकार्ड काढले गेले नव्हते. आर्थिक गुंतवणुकीचा  वारसा हक्क सांगण्यासाठी त्यांनी बँकेसमोर विविध कागदपत्रे सादर केली. परंतु बँकेच्या नियमानुसार पॅन कार्ड महत्त्वाचे होते. तेव्हा त्यांनी याबाबत एस. डब्ल्यू. एस. कडे विचारणा केली असता आम्ही त्यांना त्वरित होकार देत त्यांना पॅन कार्ड कसे मिळवून देता येईल याबाबत तपास सुरू केला. त्यातून आम्हाला अनिवासी भारतीयांसाठी पॅन कार्ड कसे उपलब्ध करता येईल याबद्दल माहिती मिळवली. त्यासाठी आवश्यक ती अर्ज व कागदपत्रे यांची यादी आम्ही ई-मेल द्वारे ग्राहकाला (मुलाला) कळवली. त्यांनी त्या अर्जांवर व कागदपत्रांवर सही करून ती कुरिअरने भारतात आम्हाला पाठवली.ती आम्ही भारतातील पॅनकार्ड विभागाकडे सुपूर्त केली. त्यांनी सर्व माहिती बरोबर आहे याची पडताळणी  केली. त्यांना 21 दिवसांनंतर त्यांच्या भारतीय पत्त्यावर पॅन कार्डचे कुरियर आले. ते त्यांनी बँकेत सुपूर्त करून बँकेच्या नियमांची पूर्तता केली व बँकेने त्यांना गुंतवणुकीवरील हक्क दिला.

आजच्या टेक्नॉलॉजीच्या जगात या गोष्टी कमी वेळात व सहजगत्या उपलब्ध होऊ शकल्या नाही तर त्यांच्या गुंतवणुकीचा फायदा त्यांना वा त्यांच्या वारसांना झाला नसता. आर्थिकदृष्ट्या साक्षर असणाऱ्या व्यक्तीने पॅन कार्ड हे लवकरात लवकर काढणे गरजेचे आहे. या एका कागदपत्रामुळे भविष्यातील शारीरिक/ मानसिक त्रासातून सुटका होते. नाही का...???

- श्री. ऋषभ सोनवणे 
गुंतवणुक  सल्लागार
S.W.S.F.S.P.L.